मुंबई : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या केंद्र सरकारने कमीत कमी वेळात जनतेच्या जास्तीत जास्त अपेक्षा पूर्ण केल्या आहेत,’ असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी (ता. २९) मुंबईत केले.
मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सरकारच्या कामाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी, भाजप प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये, मधू चव्हाण, गणेश हाके, अतुल शाह व कांता नलावडे उपस्थित होते.
गडकरी म्हणाले, ‘देशामध्ये नेहरू गांधी घराण्याची राजवट ४० वर्षे होती. त्या काळात झालेले विकासाचे काम आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ४८ महिन्यांच्या कारकीर्दीत झालेले काम याची तुलना जनतेने जरूर करावी. अशी तुलना केली, तर ध्यानात येईल की, नेहरू गांधी परिवार ४८ वर्षांमध्ये जेवढे काम करू शकला नाही तेवढे काम आम्ही ४८ महिन्यांत केलेले आहे.’
ते म्हणाले की, ‘मोदी सरकारच्या ४८ महिन्यांच्या कालावधीत फार मोठे सामाजिक व आर्थिक परिवर्तन झाले आहे. या सरकारच्या कामामुळे कोट्यवधी सामान्य लोकांच्या आयुष्यात चांगला बदल झाला आहे. मोफत गॅस कनेक्शनची उज्ज्वला योजना, गरिबांची बँक खाती सुरू करण्याची जनधन योजना आणि प्रत्येक कुटुंबाला वैद्यकीय उपचारासाठी दरवर्षी पाच लाख रुपयांचे कवच देणारी सुमारे दहा कोटी कुटुंबांसाठीची आयुष्मान भारत योजना अशी अनेक कामे मोदी सरकारने कोट्यवधी सामान्य लोकांसाठी केलेली आहेत.’
‘महाराष्ट्रातील अपूर्ण सिंचन प्रकल्प, तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्त क्षेत्रात आणि दुष्काळी भागात सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने हजारो कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हे प्रकल्प पूर्ण करून राज्य सरकारच्या साथीने पुढील वर्षीच्या डिसेंबर महिन्यापर्यंत राज्यातील सिंचनाखालील क्षेत्र सध्याच्या १८ टक्क्यांवरून दुप्पट करण्यात येईल. शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी पाणी हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे व त्याविषयी सरकार काम करत आहे. या सोबत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शेतीतील मालाच्या आधारे इथेनॉलसारखी उत्पादने निर्माण करणे तसेच ऊर्जानिर्मिती करणे असे उपाय सरकारने हाती घेतले आहेत,’ असे गडकरी यांनी नमूद केले.
गरीब कल्याण, सामाजिक विकास, पायाभूत सुविधा, आर्थिक विकास, जलवाहतूक विकास अशा विविध क्षेत्रात केंद्र सरकारने केलेल्या ठोस कामगिरीची माहिती या प्रसंगी गडकरी यांनी आकडेवारीसह दिली.